शेखचिल्ली पाकिस्तानने भारताशी व्यापार बंद करून मारली पायावर कुऱ्हाड !

indo pak map

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | भारताशी व्यापार करण्यावर बंदी घालणे पाकिस्तानला आता चांगलेच महागात पडत आहे. पाकिस्तान सरकारने जम्मू काश्मीरविषयी आग ओकत घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानची सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. कापसाची आयात करण्यासाठी पाकिस्तानला आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत. कारण, भारताकडून स्वस्तात कापूस खरेदी पाकिस्तानने स्वतःहून बंद केली. याशिवाय पाकिस्तानमध्ये औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचाही तुटवडा निर्माण झाला आहे.

 

कापूस उत्पादनात सतत घसरण होत आहे. पाकिस्तानला स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी परदेशातून महागडे कापसाचे सूत आयात करावे लागू शकते, अशी शंका पाकिस्तानमधील माध्यमे व्यक्त करत आहेत. पाकिस्तान कॉटन जिनर्स असोसिएशनच्या आकडेवारीचा हवाला देत सूत उत्पादनात २६.५४ टक्क्यांची घसरण झाल्याचाही उल्लेख वृत्तात करण्यात आला होता.

पाकिस्तानमध्ये यावर्षी कापसाचे उत्पादन अत्यंत कमी आहे. मात्र भारतात कापसाचे उत्पादन वाढणार आहे. भारतीय कॉटन संघटनेच्या अंदाजानुसार, यावर्षी कापसाचे उत्पादन ३५४ लाख गाठ राहू शकते, तर गेल्या वर्षी हे उत्पादन ३१२ लाख गाठ एवढे होते.सीमावर्ती देश असल्यामुळे पाकिस्तानला भारतातून कापूस विकत घेणे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे आणि स्वस्त होते. मात्र व्यापार बंद झाल्यामुळे भारताकडून कापूस खरेदीही बंद झाली आहे. भारतीय कापसाचा सध्याचा दर ६९ सेंट प्रति पौंड आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात हाच दर ७४ सेंट प्रति पौंड आहे. त्यामुळे भारताकडून कापूस खरेदी पाकिस्तानला तुलनेने स्वस्त आहे.

भारतीय व्यापाऱ्यांच्या मते, पाकिस्तानने भारतासोबत व्यापार सुरु केल्यास गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त कापूस खरेदी करता येईल. कारण, यावर्षी पाकिस्तानमध्ये कापसाचे उत्पादन कमी आहे. अमेरिकन संस्था यूएसडीएच्या ताज्या अंदाजानुसार, पाकिस्तानमध्ये यावर्षी कापसाचे उत्पादन ८९.९ लाख गाठ आहे, जे गेल्या वर्षीच्या ९७.५ लाख गाठीपेक्षा कमी आहे. यूएसडीएच्या मते, पाकिस्तानमध्ये यावर्षी १३७.२ लाख गाठीची गरज पडू शकते आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी ४२.६ लाख गाठ आयात करण्याची आवश्यकता आहे.केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जम्मू काश्मीरमधील कलम ३७० मधील महत्त्वाच्या तरतुदी काढल्यानंतर पाकिस्तानने अधिकृतपणे भारतासोबतचे संबंध तोडले. यामुळे कापसाची निर्यातही बंद आहे. व्यावसायिक संबंधही तुटल्यामुळे पाकिस्तानमधील जनतेला महागाईची झळ सोसावी लागत आहे.

Protected Content