पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे श्रीविठ्ठल मंदिरात शासकीय पुजा करून राज्यातील जनतेच्या सुख-समृध्दीसाठी साकडे घातले.
कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकर्यांचा मेळा फुलला आहे. यानिमित्त पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली. दरम्यान, यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला.
यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विठ्ठल हा सामान्य माणसांचा, कष्टकर्यांचा, शेतकर्यांचा देव आहे. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत, त्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं, यासाठी काम करण्याची शक्ती आम्हाला मिळो अशी प्रार्थना आज आपण केल्याचे ते म्हणाले. तसेच, याप्रसंगी शासकीय महापूजा झाल्यानंतर फडणवीसांनी पंढरपूर ते घुमान सायकल वारीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.