महावितरणचे मुख्य अभियंता थकबाकी वसूलीसाठी मैदानात

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विजेच्या वापरासाठी बिल भरण्यास विलंब करणाऱ्या ग्राहकांमुळे महावितरणच्या अकोला परिमंडळातील थकबाकीची रक्कम २९४ कोटी ४१ लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. आर्थिक वर्षाच्या समाप्तीस अवघे २५ दिवस शिल्लक असल्याने वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कडक पावले उचलली आहेत. मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून वसुली मोहिमेत सहभागी झाले असून, थकबाकीदारांनी सहकार्य करून तातडीने वीजबिल भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मार्च महिना आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा असल्याने अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर प्रकारातील वीज ग्राहकांकडून एकूण २९४ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी वसूल करणे आवश्यक आहे. मात्र, मागील पाच दिवसांत केवळ १७ कोटी ५१ लाख रुपयांची वसुली झाली असून, उर्वरित २७६ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. विभाग, उपविभाग व शाखा कार्यालय स्तरावर वीजबिल वसुली मोहिमा जोरात सुरू असून, महावितरणचे कर्मचारी थेट ग्राहकांच्या दारात जाऊन वीजबिल भरण्याचा आग्रह धरत आहेत.

वीजबिल वसुली मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके, अजय शिंदे आणि अजितपालसिंह दिनोरे थेट जिल्हास्तरावर जाऊन सहभाग घेत आहेत. थकबाकीदार ग्राहकांकडून वीजबिल भरण्यास प्रतिसाद न मिळाल्यास त्यांच्या वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देशही मुख्य अभियंता यांनी दिले आहेत.

परिमंडळातील थकबाकीचे तपशील असे आहेतः अकोला जिल्ह्यात १०२ कोटी ५३ लाख रुपये, बुलडाणा जिल्ह्यात १४१ कोटी ६७ लाख रुपये, आणि वाशिम जिल्ह्यात ५० कोटी २१ लाख रुपये इतकी थकबाकी आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणने वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सार्वजनिक सुट्ट्यांमध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ग्राहकांना महावितरण मोबाइल ॲप, संकेतस्थळ आणि ऑनलाइन माध्यमातूनही वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय वीजबिल भरता येणार आहे.

Protected Content