सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीला कीड लावण्याचे काम ! – अजित पवार

aajit pawar

बदलापूर वृत्तसंस्था । राज्यात लोकशाहीला सत्ताधाऱ्यांकडून कीड लावण्याचे काम सुरू आहे, राज्यात विकासाच्या नावावर फक्त बनवाबनवी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुरबाड येथील जाहीर सभेत केला. मुरबाड विधानसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार आणि पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे किसन कथोरे यांच्या विरोधात आघाडीकडून राष्ट्रवादीने सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना रिंगणात उतरवले आहे. मंगळवारी मुरबाड तहसिल कार्यालयात हिंदुराव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पवार यांनी उपस्थिती लावली होती

पुढे बोलतांना पवार म्हणले की, ‘बुलेट ट्रेननंतर आणा, आधी मुंबईतील रेल्वे स्थानकांची परिस्थिती सुधारा’, असा टोलाही पवार यांनी सरकारला लगावला आहे. सध्याचे सरकार लोकशाहीला कीड लावण्याचे काम करत असून, त्यामुळे राज्याचा विकास खुंटला झाल्याचा आरोप पवार यांनी केला. समृद्धीचा विकास करताना शेतकऱ्यांना तटपुंज्या जमिनीच्या किंमती देत सत्ताधाऱ्यांनी उखळ पांढरे केले आहे. कल्याण, डोंबिवली, मुरबाड या शहरांमध्ये सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे विकासाच्या घोषणा करत सगळीकडे हे सरकार बनवाबनवी करत असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. सरकारी पैशांचा वापर करत जाहिरातींवर पैसा उधाळला जातो. मात्र, त्यांच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. याला जबाबदार कोण असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. शरद पवार यांचा कुठल्याही संस्थेशी संबंध नसताना त्यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे सत्तेवर कोणीही कायमचा बसण्यासाठी आलेला नाही. हे सरकार लोकशाहीचा नख लावण्याचे काम करत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. सत्ताधारी इतर पक्षातील नेत्यांना पक्षात येण्यासाठी कारवाईची धमकी देत आहेत. आमच्याकडे १५ वर्षे सत्ता असतानाही दडपशाही केली नाही, असे ते म्हणाले.

Protected Content