धरणगाव, प्रतिनिधी | निम्मे शैक्षणिक वर्ष संपण्यात आले तरी समाज कल्याण विभागाकडून राज्यभरात अनुसूचित जाती-जमातीच्या लाखो विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे युवक काँग्रेसतर्फे आज (दि.११) येथे तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्यभरात अनुसूचित जातींसह इतर वर्गातील ५,७१,३२४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी अद्याप केवळ एक लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करण्यात आली आहे. तालुक्यात अद्याप एकाही विद्यार्थ्यांला शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जर ३१ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या लाभ मिळाला नाही तर युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गौरवसिंग चव्हाण यांनी त्यात दिला आहे. निवेदन देताना तालुका कॉंग्रेसचे रामचंद्र माळी तसेच युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी भूषण भागवत, गौरवसिंग चव्हाण, योगेश येवले, ललित मराठे, शिवा महाजन, विशाल महाजन, गौरव शुक्ल, भगवान पाटिल,विलास पाटिल, प्रतीक सुतार हे उपस्थित होते.