अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडा

मंत्री पाटील यांच्या धुळे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्यात यावे अशा सुचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारीना दिल्या आहेत.
याबाबत मंत्री अनिल पाटील यांची अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, रामराव पाटील, गणेश भामरे, विजय पाटील, जगदीश पाटील, साहेबराव पाटील, उदय पाटील, प्रणव पाटील, गुणवंत पाटील, बोर्दडेचे सरपंच सोनु संदानशिव, संतोष चौधरी, राजु पाटील, विकास पाटील, लोण बुचे सरपंच कैलास पाटील, प्रफुल्ल पाटील, सर्जेराव पाटील, सुनिल पवार यांच्या सह कळंबु, भिलाली, शहापूर, तांदळी, मांडळ, भरवस, पाडसे, खेडी, वासरे, लोण ग्रुप गाव येथील ग्रामस्थ मंडळी यांनी भेट घेऊन सद्यस्थिती मांडत आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.

त्यानुसार मंत्री अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे, यात म्हटले आहे की अमळनेर मतदारसंघातील पांझरा नदी काठच्या १६ ते १७ गावांच्या पाणीपुरवठा योजना या पांझरा नदी पात्रात आहेत. पांझरा नदी पात्रात पाणी नसल्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी ह्या कोरड्या पडत आहेत. अमळनेर तालुका दुष्काळी असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासण्याची शक्यता आहे. तरी अक्कलपाडा धरणातून लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे अशा सूचना मंत्री पाटील यांनी केल्या आहेत.

Protected Content