रावेर येथील चौघांचा ‘एमपीडीए’ कोर्टाने केला रद्द

रावेर प्रतिनिधी । रावेर दंगलीतील मधुकर पहेलवान, शेख मकबूल अहमद मोहिनुद्दीन, शेख कालू शेख नूरा, आदिल खान ऊर्फ राजू बशीर खान या चार जणांना ‘एमपीडीए’ कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाला खंडपीठाने रद्दबातल ठरविले आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेर शहर हे संवेदनशील असून येथे अनेकदा जातीय दंगली घडल्या आहेत. यामुळे उपद्रवींना अद्दल घडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मधुकर पहेलवान, शेख मकबूल अहमद मोहिनुद्दीन, शेख कालू शेख नूरा, आदिल खान ऊर्फ राजू बशीर खान अशा चार संशयितांना एमपीडीए कायद्यानुसार एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे आदेश १९ सप्टेंबर २०२० रोजी दिले होते. त्यानुसार चौघा संशयितांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले होते. या आदेशांविरुद्ध चौघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांचा आदेश रद्दबातल करत या चौघांना कारागृहातून त्वरीत सोडावे, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिले आहेत.

न्यायमूर्ती टी. व्ही. नलवाडे व न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर यांच्या पीठासमोर सुनावणी होऊन हा आदेश रद्द करण्यात आला आहे. आरोपींतर्फे औरंगाबाद येथील अ‍ॅड. जयदीप चटर्जी यांनी बाजू मांडली. त्यांना रावेरचे अ‍ॅड. लक्ष्मीकांत शिंदे यांनी सहकार्य केले. सरकारतर्फे अ‍ॅड. एम. एम. नेरलीकर यांनी युक्तीवाद केला.

Protected Content