दिल्ली (वृत्तसंस्था) ‘उद्धव ठाकरे हे दहावेळा अयोध्येला गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच राम मंदिराची निर्मिती होईल’, अशा शब्दात आठवले यांनी उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांना सोबत घेऊन १६ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी खासदार आणि कुटुंबासह कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. आता ते १६ जूनला अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्याची देशभरात चर्चा सुरू आहे.
मागील वर्षी उद्धव ठाकरे यांनी ‘पहले मंदिर…फिर सरकार…’अशी घोषणा दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी रामदास आठवले यांना विचारल्यानंतर त्यांनी हा दौरा म्हणजे शिवसेनेच्या खासदारांना अयोध्या दर्शन घडवून आणण्यासाठीचा दौरा आहे, असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येला गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत सर्वांना वाट पाहावी लागणार आहे, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. कोर्टाच्या निर्णयानंतरच मंदिराची निर्मिती होईल, असेही रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.