राहूल गांधी येणार जिल्ह्यात : ‘भारत जोडो’ अभियानात घेणार सभा

Jalgaon जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहूल गांधी Rahul Gandhi हे ‘भारत जोडो’ अभियानात जळगाव जिल्ह्यात येणार आहेत.

खासदार राहूल गांधी यांनी ७ सप्टेंबर पासून भारत जोडो यात्रा काढण्याचे आज जाहीर केले आहे. ७ रोजी कन्याकुमारी येथून यात्रेला प्रारंभ होणार असून यात १२ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांमधून ते ३५०० किलोमीटरचे अंतर ते कापणार आहेत. यात मार्गावर येणार्‍या सर्व शहर आणि गावांमधील जनतेशी ते संवाद साधणार आहेत.

दरम्यान, याच भारत जोडो यात्रेत त्यांच्या महाराष्ट्रात दोन सभा होणार आहेत. यातील एक सभा नांदेड येथे तर दुसरी जळगावात होणार असल्याचे त्यांच्या अधिकृत दौर्‍यात जाहीर करण्यात आले आहे. आज दिल्लीत जयराम रमेश आणि दिग्वीजय सिंग यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

आपल्या या पदयात्रेत राहूल गांधी हे नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलडाणा मार्गे जळगाव जिल्ह्यात येणार आहेत. येथून ते मध्यप्रदेशातून पुढे जाणार आहेत. या यात्रेत त्यांची सभा नेमकी केव्हा, कुठे आणि किती तारखेला होणार याची माहिती आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आलेली नाही. तथापि, त्यांच्या यात्रेच्या नकाशात याला ठळकपणे नमूद करण्यात आलेले आहे. ते मध्यप्रदेशात जातांना फैजपूर येथील ऐतीहासीक कॉंग्रेस अधिवेशनाच्या स्थळाला देखील भेट देण्याची शक्यता आहे.

Protected Content