जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रामदेववाडी प्रकरणात चार जणांचे बळी जाऊन देखील एमआयडीसी पोलीस स्थानकाचे निरिक्षक आव्हाड यांनी बोटचेपी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोकदादा शिंदे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले असून यात रामदेववाडी येथील प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे धनदांडग्यांच्या मुलांनी गाड्यांची शर्यत लावली असता यात झालेल्या अपघातात चार निष्पाप गरीबांचा जीव गेला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या निरिक्षकांनी गांजा सापडला असतांना देखील अशी नोंद केली नाही. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुविधा असतांना देखील संशयितांना खासगी रूग्णालयात जाण्याची परवानगी दिली कशी ? असा सवाल या निवेदनात विचारण्यात आला आहे.
या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकाच्या निरिक्षकांनी आर्थिक हितापोटी आरोपींना बचावण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, आगामी काळात एलसीबीच्या प्रमुखपदाची धुरा मिळण्यासाठी राजकीय व्यक्तींचा आशीर्वाद हवा असल्याने पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांनी हे काम केले असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.