काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी पृथ्वीराज साठे; आसामच्या निवडणुकीची जबाबदारी

मुंबई । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड केली आहे. साठे यांच्याकडे आसाम राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुढील वर्षी आसाम विधानसभेच्या निवडणुका होत असून त्यादृष्टीने त्यांची निवड महत्वाची मानली जात आहे.

पृथ्वीराज साठे यांनी १९९२ मध्ये एनएसयुआयच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी एनएसयुच्या माध्यमातून निवडणूक लढवून विजयही संपादन केला होता. त्यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रसचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. २००७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुलजी गांधी यांच्या कोअर ग्रुपचे ते सदस्य होते.  युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वय पदावर असताना कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नात्याने पक्षाच्या दैनंदिन कामकाजात तसेच विविध कार्यक्रमांच्या आयोजन आणि समन्वयात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. काँग्रेस पक्षाने त्यांना दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे.

साठे हे उच्चाविद्याभूषीत आहेत. विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विषयांचा त्यांचा अभ्यास आहे. पक्ष संघटना बांधणीच्या कामातही त्यांचा हातखंडा आहे. समाजातील विविध लोकांशी, संघटनांशी असलेला दांडगा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. पृथ्वीराज साठे यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी राष्ट्रीय सचिवपदी बढती देत आसाम राज्याची जबाबदारीही सोपवलेली आहे

 

Protected Content