आचारसंहिता काळात ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई; पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची माहिती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने गेल्या काही महिन्यांपासून कारवाईचा धडाका लावलेला होता. आचारसंहिता लागल्यापासून जिल्ह्यात मोक्का, एमपीडीएसह सुमारे ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच आर्म ॲक्ट, एमडी, गुटखा, गांजा असा एकूण सुमारे ४ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी सोमवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. गेल्या महिन्यात देशभरात आचार संहिता लागल्यापासून निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आले होते. १६ मार्च पासून पोलीस दलाकडून सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी तसेच अवैध धंदे चालकांवर कारवाईचा धडाका लावलेला होता. यामध्ये आतापर्यंत जिल्हाभरात सुमारे ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्क कारवाई करण्यात आली आहे. यात ९ जणांविरुद्ध एमपीडीएतंर्गत तर १ गँगवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापैकी ३ हजार २५० जणांना नोटीस बजावण्यात आली असून २ हजार ७६४ जणांना नॉल बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले. यावेळी भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे उपस्थित होते.

जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी ज्याप्रमाणे प्रतिबंधात्क कारवाई करण्यात आल्या. त्याचप्रमाणे अवैध धंदे चालकांसह आमली पदार्थांची वाहतुक व विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ७३८ दारुबंदीची कारवाई केल असून त्यामध्ये १ कोटी ७ लाख रुपयांची २ लाख ६० हजार लिटर अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

Protected Content