वीज पुरवठा सुरळीत करा नाहीतर जिल्ह्यातील सर्व रस्ते बंद करु – गिरीश महाजन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुरळीत वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी आज माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. याप्रसंगी येत्या दोन-तीन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर जळगाव जिल्ह्यातील सर्व रस्ते बंद करण्यात येऊन एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही.” असा इशारा भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिला.

राज्य सरकारच्या निषेधार्थ विविध घोषणा देत सहभागी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यात पुढे बोलतांना ‘शेतकऱ्यांच्या दृष्टीने विजेचा प्रश्न अतिशय महत्वाचा असून भारनियमनामुळे शेतकऱ्यांची पीकं जळून जात आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचं चित्र असताना आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते मात्र एसीमध्ये बसून हे सर्व पाहताहेत परंतु, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही ठोस उपाय किंवा निर्णय घेताना दिसत नसल्याचे’ गिरीश महाजन यांनी सांगितले.

याप्रसंगी आ.गिरीश महाजन महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असताना भाजपने काढलेला जन आक्रोश मोर्चा हा केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात का काढला जात नाही? असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा हा मोर्चा म्हणजे दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप केला होता त्यावर प्रत्युत्तर देतांना गिरीश महाजन यांनी, “महागाई विरोधात आंदोलन करून पाहावे असे आघाडी सरकारला आवाहन करत किती लोक येतात ते कळेलच.” असे सांगत पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढले असल्यामुळे त्याचा परिणाम भारतातही होत असल्याचे कारण देत त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याचे सांगितले.

 
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4954712257969046

Protected Content