नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सतराव्या लोकसभेसाठी १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील सात जागांसह देशातील विविध राज्यांतील निवडक जागांवर मतदान झाले आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर लोकांची रिघ लागली होती. पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान शांततेत पार पडले. ९१ मतदारसंघात १.७ लाख मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी ही माहिती सायंकाळी पत्रकारांना दिली.
महाराष्ट्रात संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत वर्ध्यात ५५.३६ टक्के, रामटेकमध्ये ५१.७२ टक्के, नागपूरमध्ये ५३.१३ टक्के, भंडारा-गोंदियात ६०.५० टक्के, गडचिरोली-चिमूर ६१.३३ टक्के, चंद्रपूर ५५.९७ टक्के आणि यवतमाळ-वाशीममध्ये ५३.९७ टक्के मतदान झाले. तेलंगणमध्ये ६०.५७ टक्के, मेघालयात ६२ टक्के, उत्तर प्रदेशात ५८.७७ टक्के मणिपूर ७८ टक्के, बिहार ५०.२६ टक्के लक्षद्वीप ६५.९ टक्के आणि असाममध्ये ६८ टक्के मतदान झाले.