जळगाव (विशेष प्रतिनिधी) आपल्या गणात विकास कामांसाठी निधी नसल्याने आणि अधिकारांवर गंडांतर येत असल्याने जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांचे सभापती व १३४ सदस्यांनी सोमवारी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य पंचायत समिती सदस्य संघर्ष समितीच्या आज (दि.२२) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राजीनाम्याच्या नमुन्यावर यावेळी सदस्यांनी स्वाक्षऱ्याही केल्या आहेत. प.स. च्या अधिकाऱ्यांच्या अधिकारात कपात करण्यात आल्याने पदाधिकारी व सदस्यांना हवा तो सन्मान मिळत नाही. तसेच विकास कामांसाठी निधीच नसल्याने कामे करता येत नाहीत. याबाबत वेळोवेळी मागणी व आंदोलन करूनही काहीच उपयोग झालेला नाही. त्यामुळे प.स. सदस्यांना ५० लाखांचा विकास निधी मिळावा, तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळावा, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत.