पल्लवी सावकारे यांचे नवीन पत्र; कारवाईसाठी पाठपुरावा सुरूच

जळगाव प्रतिनिधी । गौण खनिज गैरव्यवहार आणि वाळूच्या बोगस पावत्यांच्या प्रकरणी कारवाई व्हावी या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्या सौ. पल्लवी प्रमोद सावकारे यांनी सीईओंना तब्बल सतरावे पत्र दिले आहे. यामुळे आता या प्रकरणी कधी कारवाई होणा हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

वाळूच्या बोगस पावत्या लावून बिले काढणे, शासकीय कामांमध्ये गौण खनिजांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये तक्रारीत तथ्य असल्याने जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एल. पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांपुढे मान्य केले होते. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देवून संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले होते. दरम्यान, या प्रकरणात जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एल. पाटील यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी देखील कोणतीही कारवाई करत नसल्याची तक्रार पल्लवी सावकारे यांनी केली आहे. याबाबत तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी त्यांनी पुन्हा ७ जानेवारीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना पत्र दिले आहे.

विशेष बाब म्हणजे सौ. पल्लवी सावकारे यांनी कारवाईच्या मागणीसाठी दिलेले हे सतरावे पत्र आहे. यामुळे आता तरी त्यांच्या मागणीनुसार कारवाई होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content