पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उद्या शहरात आंदोलन करण्यात येणार आहे.
पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत ग्रीकल्चरल इन्शुअरंस कंपनी (ए. आय. सी.) मार्फत सततच्या पावसाने कापुस व इतर पिकांचे झालेल्या नुकसानी पोटी विमा कंपनीकडून अत्यल्प नुकसान भरपाई मिळाली. एकुण १४ हजार १८ शेतकर्यांपैकी फक्त ६ हजार शेतकर्यांना तुटपुंजी भरपाई मिळाली. बाकी शेतकरी ऑनलाईन तक्रार करण्यासाठी गेले असता कंपनीचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन तक्रार दाखल करु शकले नाहीत. विमा कंपनीची ही तांत्रीक चुक होती तरी विमा काढलेल्या सर्व शेतकर्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी. या रास्त मागण्यांसंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली १५ फेब्रुवारी रोजी पाचोरा तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील एकुण शेतकरी १४ हजार ९८, शेतकर्यांनी विमा हप्त्यापोटी भरलेली रक्कम – २ कोटी ५२ लक्ष ६९ हजार ८२८ रुपये, राज्य सरकारचा हिस्सा रक्कम – १ कोटी ३४ लाख ६० हजार ६०६ रुपये, केंद्र सरकारचा हिस्सा रक्कम – १ कोटी ३४ लाख ६० हजार ६०६ रुपये, विमा कंपनीकडे जमा झालेली एकुण – रक्कम – ५ कोटी २१ लक्ष ९१ हजार ४० रुपये, शेतकर्यांना विमा कंपनीकडून मिळालेली भरपाई रक्कम – ३ कोटी ३६ लक्ष ९९ हजार २६७ रुपये, विमा कंपनीने कमविलेल्या नफ्याची रक्कम – १ कोटी ८४ लक्ष ९१ हजार ७७९ रुपये, एकुण संरक्षीत रक्कम – ५२ कोटी २९ हजार २९४ रुपये, ह्या तफावतीच्या निषेधार्थ तसेच कापुस, सुर्यफूल, तुर, सोयाबीन या सर्व पिकांना विदर्भातील धान पिकाप्रमाणे प्रति क्विंटल २ हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी यात करण्यात आली आहे.
या मागण्यांसंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ पाचोरा तहसिल कार्यालयासमोर १५ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सदरच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास दि. १६ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सनदशीर मार्गाने मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.