पाच वर्षात संपेल देशातील पेट्रोल ! : गडकरींचे महत्त्वाचे विधान

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाच वर्षात देशातील पेट्रोल संपणार असल्याचा इशारा देत, आगामी काळ हा अपारंपरीक उर्जास्त्रोतांचा असेल असे स्पष्ट केले आहे. ते पंजाबराव देशमुख कृषी विद्यालयातील कार्यक्रमात बोलत होते.

अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी यांना कृषी विद्यापीठातर्फे ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी त्यांनी इंधन समस्येवर भाष्य केले. ते म्हणाले की, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना, येत्या पाच वर्षांत देशातून पेट्रोल संपुष्टात आणून त्यावर बंदी घालण्यात येईल. याची जागा बायो-इथेनॉल घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात गडकरी म्हणाले की, इथेनॉलच्या निर्णयामुळे देशाचे २०,००० कोटी रुपयांची बचत झाली आहे. नजीकच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहने ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर आधारित असतील. विहिरीच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन बनवता येते आणि ते ७० रुपये प्रति किलो दराने विकता येते. केवळ गहू, तांदूळ, मका लावून कोणताही शेतकरी आपले भविष्य बदलू शकत नाही, असे ते म्हणाले. शेतकर्‍यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जा प्रदाता बनण्याची गरज असल्याचेही गडकरींनी यावेळी स्पष्ट केले.

Protected Content