आयुध निर्माणीतील कर्मचारी पुरातून बचावला

भुसावळ प्रतिनिधी । कार्यालयातून घरी जातांना पाण्याच्या पुरात पडलेल्या वरणगाव आयुध निर्माणीच्या कर्मचार्‍याला जवानांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वरणगाव परीसरात संततधार पावसाने लवकी या नाल्याला पूर आल्याने या पुरातून घरी जाताना वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी दीपक पाटील हे पाण्यात पडले. मात्र याच वेळी या ठिकाणी उपस्थित वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उड्या घेवून या कर्मचार्याचे प्राण वाचवले. दीपक पाटील हे कर्तव्य संपल्यानंतर घराकडे जात असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी दुचाकी लवकी नाल्यातून पुढे नेण्याच्या प्रयत्न केला. मात्र वाहन बंद पडले व पाण्याच्या प्रवाहात दीपक देखील वाहू लागले वेळीच दिपक यांनी प्रसंगावधान दाखवून एका खांबाला पकडले. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन विभागाचे शैलेश भालेराव, तौसीफ अली, हनपी, हेमंत झोपे, मनोज चौधरी व सुरक्षा विभागाचे दरबान पवार आदींनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्यासह दुचाकीला बाहेर काढले.

दरम्यान, या पुलाची उंची कमी असून यामध्ये कचरा अडकल्याने पुलावर पाणी व चिखल फार झालेला आहे. या कारणाने येथे छोटेमोठे अपघात घडत असतात. भुसावळहुन येणारे फुलगावचे कर्मचारी याच रस्त्याने ये-जा करतात. यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Protected Content