मुंबई, वृत्तसंस्था | “केंद्र सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊनही लोक वेगळी भूमिका का घेत नाही ? त्यांची तुलना का करत नाही ?,” असा प्रश्न उपस्थित करत “लोकांना नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा आहे,” पण सगळे विरोधक तो उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलो आहोत. असे मत पवार यांनी आज (दि.८) येथे व्यक्त केले.
राज्यात महाविकास आघाडीचे गणित जुळवून आणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवा राजकीय प्रयोग केला. मोदींनी आपल्याला ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोटही शरद पवार यांनी सत्ता स्थापनेनंतर केला होता.
पवार म्हणाले,”ते त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्याचबरोबर सरकारमध्येही ते सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. त्यावरून आम्ही त्यांच्यावर टीकासुद्धा करतो. पण, अनेक लोकहितासाठी मारक निर्णय घेतल्यानंतरही लोक वेगळी भूमिका घेऊन त्यांची तुलना का करत नाही ? कारण लोकांना पर्याय अपेक्षित आहे. आम्ही पर्याय देऊ शकतो, असा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात कुणाला यश आले आहे का ?,” असेही पवार म्हणाले.
पर्याय उपलब्ध करून न देण्याचा दोष कुणाचा ? याप्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, “मी हे मान्य करतो की, आम्ही सर्व विरोधक यासाठी जबाबदार आहोत. जोपर्यंत कुणीतरी जनतेच्या मनात हा आत्मविश्वास निर्माण करत नाही की ‘अ’ हा चुकीचा आहे आणि ‘अ’ ला ‘ब’ उत्तर देऊ शकतो. मी असे केले आहे आणि त्यानंतर मिळणारा लोकांचा पाठिंबा मी अनुभवला आहे. लोक देशाविषयी विचार करतात,” असेही पवार यावेळी म्हणाले.