शिरसाड येथे विहीरीत तोल जाऊन पंधरावर्षीय मुलाचा मृत्यू

Shirsat

यावल (प्रतिनिधी)। येथून जवळच असलेल्या शिरसाड येथे गावालगतच्या शेतात ठिबक नळ्या लावतांना विहीरीत तोल गेल्याने एका पंधरावर्षीय मुलाचा दुदैवी अंत झाल्याची घटना दि.१२ रोजी सकाळी घडली. यावल पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घडलेल्या घटनेबाबत गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, शिरसाड ता.यावल येथील गावालगत वासुदेव सोमा टेकडे (रा.भालोद) यांच्या शेतामध्ये आज दि.१२ रोजी सकाळी साडेआठ वाजे दरम्यान मजुरांकडून ठिबक नळ्या लावण्याचे काम चालू होते. यावेळी रविंद्र संजय अलकरी (राजपूत) (वय-१५) याचेसह सागर बारेला रा.बोरावल व करण भिलाला रा.बनुर (म.प्र.) या दोघं मजुरांसोबत सदर शेतात ठिबक नळ्या लावण्याचे काम करीत होता. नळ्या ओढण्याचे काम करत असतांना रविंद्रचा जवळच असलेल्या विहिरीत एकदम तोल जाऊन कोरडद्या विहिरीत पडला. विहिरीत पडताच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रविंद्रचा विहीरीतच दुर्दैवी अंत झाला. या घटनेत त्याचा पायही मोडला गेलेला होता. या दुदैवी घटनेची वार्ता कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत उतरणाऱ्यांच्या मदतीने मयत रविंद्रचे शव विहिरीतून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर साकळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी यावल ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन केले. उशिरापर्यंत यावल पोलिसात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. अचानक घडलेल्या घटनेने गावपरिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मयत रविंद्रच्या पश्चात आई ,वडील, दोन मोठ्या बहिणी, एक लहान भाऊ असा परिवार आहे .तर तो शालेय शिक्षण घेत होता. त्याचा घरची परिस्थिती अतिशय नाजूक असून आई-वडील शेतमजुरी करतात. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Protected Content