फैजपूर प्रतिनिधी । ओम कॉलनी परिसरात गेल्या एक वर्षापासून कमी पाणी पुरवठा केला जात असून नागरिकांनी यासंदर्भात दोन वेळा नगराध्यक्षाकडे यापुर्वी मोर्चाद्वारे निवेदन दिले होते. त्यावर उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली, मात्र गेल्या एक महिन्यापासून नळाला पाणी येणेच बंद झाले आहे. म्हणून आज (दि.19 जून) रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिका कार्यालयात जाऊन संतप्त महिलांनी पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा नगराध्यक्षा अनिता येवले यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा होत नसल्यामूळे नागरिक त्रासले असून, गेल्या पंधरा दिवसापासून एकही थेंब पाणी येत नसल्याने सदर दोन वेळा अध्यक्षांच्या दालनात गाऱ्हाणे मांडण्यासाठी रहिवासांनी मोर्चाद्वारे निवेदन दिले होते. त्यावेळी पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र यावर पाणीपुरवठा कर्मचा-यांनी विद्युत पुरवठा सुरळीत नाही, धरणात पाणी नाही अशी उडवा-उडवीची उत्तरे देवून नागरिकांची दिशा भूल करण्यात आली. मात्र, पाणी पुरवठा का होत नाही? या भागात पाण्याबाबत एवढी मोठी समस्या असून देखील एकही अधिकारी किंवा पाणी पुरवठा निरीक्षक यांनी पाहणी करणे आवश्यक न वाटता, त्यांनी यावर नगरपालिका कार्यालयात बसून उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. यावेळी, संतप्त नागरिकांनी पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक करण्यात यावा, अन्यथा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयासमोर बसू असा इशारा नीता पाटील, महेश पाटील, शोभा विनंते, बाळू विनंते, विकास बावणे, विनायक फेगडे, सुनिता पाटील यांनी यावेळी दिला आहे.