औरंगाबाद । आता मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार आहे. केंद्रीय आरक्षण आणि आरक्षणाचा टक्का वाढविण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा मार्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र दाते पाटील व किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राजेंद्र दाते पाटील म्हणाले, केंद्रीय स्तरावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जो लढा २०१२ पासून सुरू आहे. त्यावर केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार आहे. या मोर्चाची तारीख दिल्लीतून जाहीर केली जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले. या मोर्चात आरक्षणाचा टक्का वाढविण्यासह इतरही विविध मागण्यांचा समावेश असेल. परंतु ते लवकरच सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शिवाजी जगताप, सुरेश वाकडे, योगेश बहाद्दुरे, अभिजित देशमुख, मनोज गायके, प्रभाकर मते, महिला समन्वयक रेखा वाहटूळे, सुकन्या भोसले यांची उपस्थिती होती.