नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांच्यामुळे आलेल्या आर्थिक अरिष्टावर त्यांना मार्ग सापडत नाही. त्यामुळे आरबीआयमधून चोरी करून काही उपयोग होणार नाही. गोळी लागून झालेल्या जखमेवर दवाखान्यातून चोरलेले बँडेज लावण्यासारखा हा प्रकार आहे, अशी खोचक टीका माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की,देशावर आर्थिक संकट पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनीच आणले. आता त्यांना यातून कसे बाहेर पडावे ते सूचत नाहीय. अशा शब्दांत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. सोबतच, भारतीय रिझर्व्ह बँकेतून चोरी करून चालणार नाही असा टोला देखील माजी काँग्रेस अध्यक्षांनी लगावला आहे. आरबीआयने नुकतेच आपल्या राखीव (रिझर्व्ह) फंड्समधून 1 लाख 76 हजार कोटी रुपये सरकारला सुपूर्द केले. भारत सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम देण्यास मंजुरी मिळाल्याचा हा एक विक्रमच आहे. त्यावरच प्रतिक्रिया देताना राहुल यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. तर अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे.