पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, कामाला लागा : उद्धव ठाकरे

udhav

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना ही स्वतंत्रबाण्याची संघटना असून उद्याची विधानसभा आपल्याला भगवी करून सोडायची आहे. पुढच्या वर्षीच्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल त्यामुळे कामाला लागा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेना आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधान आले आहे. आज शिवसेनेचा ५४वा वर्धापन दिन असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपावर अनेक वार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय तडजोड करीत पुन्हा भाजपाशी जुळवून घेतले होते. मात्र, त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा युतीचा फॉर्म्युला, लोकसभा उपाध्यक्षपद आणि राम मंदिराचा मुद्दा यावरुन शिवसेनेची पुन्हा एकदा नाराजी दिसून आली आहे. त्यानंतर आजच्या अग्रलेखात तर थेट शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी पक्क्या निर्धाराने कामाला लागण्याचा संदेश शिवसैनिकांना देण्यात आला आहे. शिवसेना म्हणजे काय? हे महाराष्ट्राने किंवा देशानेच नव्हे तरसंपूर्ण जगाने गेल्या 53 वर्षांत अनुभवले आहे. मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी 19 जून हा भाग्याचाच दिवस मानावा लागेल. याच दिवशी शिवसेना नामक एका वादळाचा जन्म झाला.

वादळे आणि वावटळी अनेकदा येतात आणि जातात, पण शिवसेना नावाचे वादळ 52-53 वर्षे सतत घोंघावत आहे. मुंबईचा लढा, ज्या मराठी अस्मितेसाठी शिवसेना स्थापन झाली व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जीवनाच्या 50 वर्षांची आहुती दिली तो त्याग, संघर्ष, चढ-उतार नव्या पिढीने पाहिले नाहीत. पण शिवसेनेने चार पिढय़ा निश्चितच घडवल्या व शिवरायांचा भगवा मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीच्या हाती जात आहे हे महत्त्वाचे. शिवसेनेचा वटवृक्ष आज बहरला आहे. महाराष्ट्रात त्याची पाळेमुळे घट्ट रुजली, फांद्या दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचल्या. मराठी माणूस हा या जगाचा एक घटक आहे. हिंदुस्थानचा अभिमानी आहे. हिंदू संस्कार आणि संस्कृतीचा तो रक्षक आहे, असे व्यापक तत्त्वज्ञान स्वीकारून मराठी बाणा जपणारी मंडळी शिवसैनिक आहेत. शिवसेनेचे सामर्थ्य सत्ता-पदात नसून ते चळवळीत आहे. चळवळ हाच शिवसेनेचा आत्मा आहे.

 

शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही ५३ वर्षांची मजल मारू शकलो. शिवसेनेने भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांचा लढा दिला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा मराठी अस्मितेचा होता. मुंबई मिळाली. त्या मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा, पोटापाण्याचा आणि रोजगाराचा प्रश्न शिवसेनेने उचलला तेव्हा काय गहजब झाला! शिवसेनाप्रमुखांवर असे वार आणि घाव झाले की, आपल्याच माणसांची बाजू घेऊन उभे राहणे हा गुन्हाच ठरला; पण आज प. बंगालात ममता बॅनर्जी शिवसेनेचीच भूमिपुत्रांची भूमिका घेऊन उभ्या आहेत.
दक्षिणेतले प्रत्येक राज्य व पक्ष प्रांतीय अस्मितेचे राजकारण करीत आहेत. राष्ट्रीय पक्षही प्रांतीय पक्षाशी युत्या व आघाड्या करून आपापला आकडा वाढवीत आहेत. हिंदुत्वाला देशभरात जाग आणण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले. शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे आणि देवळातल्या घंटा बडवण्यापुरते नव्हते. त्यांची भूमिका सर्वसमावेशक होती. राष्ट्रद्रोही, मग ते कोणत्याही धर्माचे असतील त्यांना या देशात थारा नाही हे त्यांचे हिंदुत्व.

Protected Content