मुंबई (वृत्तसंस्था) भाजपकडून किसान कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाने याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
भाजपकडून किसन कथोरे यांनी तर काँग्रेसकडून नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज सकाळी ११ वाजता या पदासाठी निवडणूक होणार होती. परंतु, भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याने नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होणार आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, काल रात्रीपासूनच सत्ताधारी पक्षाच्या सर्व नेत्यांनी आम्हाला वारंवार आवाहन केले होते की, विधानसभा अध्यक्षपद हे वादातीत असावे यासाठी भाजपाने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा.