मुक्ताईनगरला ३२ कोटींची योजना : दोन्ही आमदार म्हणतात श्रेय आमचेच !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमृत २.० योजनेच्या अंतर्गत मुक्ताईनगरच्या पाणी पुरवठ्यासाठी तब्बल ३२ कोटी रूपयांच्या कामला प्रशासकीय मान्यता मिळाली असून हे काम आपल्यामुळेच झाल्याचे श्रेय दोन्ही आमदारांनी घेतले आहे.

२०२१-२२ वर्षापासून देशात केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० ही योजना राबविण्यात येत आहे. याच्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाणी पुरवठा, जलसाठ्यांचे पुनरूज् जीवन आणि हरीतक्षेत्र विकास आदी कामे करण्यात येत आहेत. यात राज्यातील ४४ शहरांमध्ये अमृत २.० योजना राबविण्यात येणार असून यामध्ये मुक्ताईनगरची निवड करण्यात आली होती. याच योजनेला आता प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या संदर्भातील शासनाचा जीआर देखील जारी करण्यात आला आहे.

अमृत २.० योजनेसाठी ३२ कोटी ३४ लक्ष रूपयांच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे. यातील केंद्र सरकार १६.०७ कोटी रूपये तर राज्य सरकार १४.४६ कोटी रूपये देणार आहेत. तसेच मुक्ताईनगर नगरपंचायतीला १.६१ कोटी रूपयांची तरतूद करावी लागणार आहे. या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दीड वर्ष म्हणजे १८ महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण करण्यात यावी असे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत.

दरम्यान, मुक्ताईनगरच्या पाणी पुरवठ्यासाठी अमृत २.० योजनेच्या अंतर्गत मोठा निधी प्राप्त झाल्याने शहराचा पाणी प्रश्‍न कायमचा निकाली निघणार आहे. तर, या योजनेचा जीआर निघाल्यानंतर आमदार एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील या दोन्ही गटांतर्फे आपणच यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा करण्यात आला आहे. खडसे यांच्या समर्थकांनी नाथाभाऊंमुळेच या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांनी चंदूभाऊंमुळेच मुक्ताईनगरसह बोदवड आणि सावदा येथील पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थात, दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयासाठी चढाओढ सुरू झाली असली तरी ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मुक्ताईनगरच्या नागरिकांची अपेक्षा आहे.

Protected Content