चाळीसगाव (प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील मतदार संघात प्रत्यक्ष झालेले मतदान व ई.व्ही.एम. वरील मतांची आकडेवारी जुळत नसल्याने या प्रणालीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आज भारीप बहुजन महासंघ आणि बहुजन विकास आघाडीने येथे एका मोर्चाद्वारे जावून जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाचे तिथे सभेत रुपांतर झाले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, २६ मतदार संघात मतांची संख्या कमी भरते तर २२ मतदार संघात संख्या जास्त भरते आहे. त्यामुळे ई.व्ही.एम. निर्मुलन आणि लोकशाहीचे जतन करणे आवश्यक आहे. याबाबत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर ई.व्ही.एम. विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला असल्याचे म्हटले आहे.