छेडछाड प्रकरण: अमळनेरात सर्वपक्षीय आक्रमक

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येची छेडछाड करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक व्हावी, या मागणीसाठी अमळनेरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास हजारो कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलींच्या सुरक्षेचे काय, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

अमळनेर तहसील कार्यालयात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देताना झालेल्या चर्चेत, केंद्रीय मंत्री खडसे यांच्या कन्येची छेडछाड करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक न झाल्यास सामान्य मुलींच्या सुरक्षेची हमी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अमळनेर शहरात ग्रामीण भागातून शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हजारो मुली शिक्षणासाठी येतात, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल का, त्यांना न्याय मिळेल का, असे सवाल विचारण्यात आले.

आरोपींना राजकीय पाठबळामुळे पळून जाण्यास मदत मिळाली असून, यामध्ये पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचे सहकार्य असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संबंधित आरोपींना तातडीने अटक करून कठोर शासन करावे, तसेच प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश किरण पाटील, ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर, संचालक डॉ. अनिल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पुनाजी पाटील, अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे महेंद्र बोरसे, देविदास देसले, शिंदे सेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनगर दला पाटील, किरण सावंत, गुणवंत पवार, पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे रामराव पवार, महेश पाटील, प्रा. सुनील पाटील, रवींद्र पाटील, प्रसाद चौधरी, दिलीप पाटील, कैलास पाटील, प्रताप पाटील, सुशील भोईटे, ॲड. कुंदन साळुंखे, डॉ. रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. निवेदनाची प्रत अमळनेर पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी विनायक होते यांनाही देण्यात आली आहे.

Protected Content