मंत्रीपदासाठी मतदारसंघातील जनतेचाच दबाव ! : आ. किशोरआप्पा पाटील

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपण मंत्री नसतांनाही मतदारसंघाचा चांगला विकास केला. यामुळे मंत्री झाल्यास याला वेग येईल अशी लोकांना अपेक्षा असून मला मंत्रीपद मिळावे यासाठी जनतेचाच दबाव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोरआप्पा पाटील यांनी केले आहे.

‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मंत्रीपदावरून शिंदे गटात कोणत्याही प्रकारची स्पर्धा नसून शिवसेनेचे ४० आणि अपक्ष ११ असे ५१ आमदार हे एकसंघ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यात मंत्रीपदामुळे अंतर्गत कलह असल्याचा देखील त्यांनी इन्कार केला.

दरम्यान, आमदार किशोरआप्पा पाटील पुढे म्हणाले की, पाचोरा-भडगाव मतदारसंघात माझे काका दोनदा आमदार होते. तर मी स्वत: देखील येथून दुसर्‍यांदा निवडून आलो आहे. मंत्रीपद नसतांनाही मी मतदारसंघात खूप कामे केली आहेत. यामुळे मंत्रीपद मिळाले तर अजून प्रचंड गतीने विकास होईल अशी जनतेला अपेक्षा आहे. यामुळे मंत्रीपदासाठी जनतेचा मोठा दबाव असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मागणीचा नक्कीच विचार करतील असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Protected Content