काश्मीरमध्ये लवकरच मेगा नोकरभरती – राज्यपाल

images 7

श्रीनगर, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर आता काश्मीरमधील तरुणांसाठी मेगा नोकरभरती सुरू करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी खात्यातील ५० हजार जागा रिक्त असून या जागा लवकरच भरण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज (दि.२८) एका पत्रकार परिषदेत केली. काश्मिरी तरुणांनी या नोकरभरतीचा लाभ घेण्याचे आवाहनही मलिक यांनी केलं आहे.

 

येत्या सहा महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्राच्या विविध मंत्रालयांच्या बैठका सुरू आहेत. राज्यात विकास व्हावा, ही सरकारची इच्छा असून त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले. येत्या दोन-तीन महिन्यात सर्व सरकारी रिक्त पदे भरण्यात येणार असून काश्मिरी जनतेने या सरकारी सेवेत दाखल व्हावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

काश्मीरमध्ये दहशतवादी आणि पाकिस्तानी फोन आणि इंटरनेटचा वापर करत होते. इंटरनेटद्वारे काश्मिरी जनतेच्या भावना भडकावण्याचे काम सुरू होते. भारताविरोधात हे हत्यार वापरण्यात येत होते. त्यामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हळूहळू इंटरनेट सेवाही पूर्वपदावर आणण्याचे आवश्वासन त्यांनी यावेळी दिले. कुपवाडा आणि हंदवाडामध्ये मोबाइल फोन सेवा सुरू करण्यात आली आहे, इतर जिल्ह्यातही लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मृत्यूबाबत अफवा :- काश्मीरबाबत अनेक अफवा पसरविण्यात येत आहेत. राज्यात काही ठिकाणी आंदोलने झाली. पण त्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. आमच्यासाठी प्रत्येक काश्मिरींचा प्राण महत्त्वाचा आहे. काही लोक हिंसक होऊ पाहत होते. त्यांना कमरेखाली मार लागल्याने जखमी झाले आहेत, असे मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

Protected Content