पायावरून दुचाकी गेल्याचा जाब विचारल्यावरून एकाला मारहाण

जळगाव लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महाबळ परिसरात पायावरून दुचाकी गेल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एकाला चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली तर उलटा कोयता मारून दुखापत केल्याची घटना रविवारी ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहूल राजू सोनवणे हा तरूण आपल्या परिवारासह महाबळ येथील सुरेश नगरात राहतो. रविवारी ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता राहूल सोनवणे हा महाबळ येथील सुरेश नगर येथे रस्त्यावर उभा असतांना त्यांच्या पायावरून दुचाकी गेली. याचा जाब विचारल्याच्या रागातून बंडू उर्फ राजेश दिनेश परदेशी, रोहीत दिनेश परदेशी, नितीन संतोष सोनवणे, गणेश बुधा सोनवणे रा. समता नगर, जळगाव या चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली तर यावतील गणेश सोनवणे याने हातातील कोयता उलटा मारून उजव्या खांद्यावर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या राहूल सोनवणे याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी दुपारी साडेतीन वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.

Protected Content