जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर आणि यावल तालुक्यांमध्ये काल आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे शेतीत मोठे नुकसान झाले आहे. पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर रावेर-यावल मतदारसंघाचे आ. अमोल जावळे यांनी तात्काळ पुढाकार घेत प्रशासनाला नुकसानग्रस्त गावांमध्ये त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
अधिकाऱ्यांनी केली पाहणी
आज संबंधित विभागाच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या पथकाने रावेर तालुक्यातील विवरे, चिनावल, रोझोदा तसेच यावल तालुक्यातील न्हावी या गावांना भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी बबन काकडे, तहसीलदार बंडू कापसे, कृषी अधिकारी चंद्रकांत वाळके, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, तसेच सुरेश धनके, पद्माकर महाजन, सूर्यकांत देशमुख, वासू नरवाडे, प्रवीण वारके, पराग वाघुळदे आदी प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
शासनाकडून मदतीचे आश्वासन
आमदार अमोलभाऊ जावळे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, “शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे. कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.” या दौऱ्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागल्याने पंचनाम्यांचे काम लवकर पूर्ण होऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.