जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महिला आयोग व मू.जे.महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला कायदेविषयक जाणीव-जागृती राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आणि बीजभाषण जळगावच्या अप्पर पोलीस निरीक्षक भाग्यश्री नवटके यांनी केले त्यात “पोक्सो व महिला अत्याचारसंबंधित” महिलांच्या सुरक्षीततेसंबंधीच्या कायद्यांविषयी माहिती दिली. यावेळी विचारपिठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या मीनाक्षी वायकोळे व के.सी.ई.व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते. दुपारच्या सत्रात सहाय्यक पोलीस अधीक्षक नीता कायटे यांनी महिला सुरक्षितेसाठी कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी पोलीस कशाप्रकारे मदत करू शकतात याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर मणियार विधी महाविद्यालयाच्या डॉ.विजेता सिंग यांनी लैगिक व शैक्षणिक समानता या विषयावर प्रोजेक्टरव्दारे प्रस्तुतीकरण करून अनेक विषयांवर चर्चा केली. मुलींना समान शिक्षण दिले पाहिजे असे मत त्यांनी प्रकर्षाने मांडले यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले. त्यातून हुंडाबंदी, सुरक्षितता आणि इतर कायदेविषयक माहिती देण्यात आली. या पथनाट्यात चंद्रकांत इंगळे, विकास वाघ, विनोद पाटील, नेहा पवार, हर्षा शर्मा, करण माळकर, निलेश लोहार, आम्रपाली साळवे यांनी भाग घेतला.
यानंतर निवृत्त न्यायाधीश राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या मीरा खडककर यांनी “महिला घरातच सुरक्षित नाही, त्यांना सन्मान आणि संरक्षण मिळत नाही” अशा भावना व्यक्त केल्या. या कार्यशाळेत जळगाव शहरातील १६ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी गटचर्चेचे आयोजन करण्यात आले. त्यात अॅड.मंगला ठोंबरे, प्रा. शेखर सोनाळकर, प्रा.ज्योती भोळे, रोहिदास ठोंबरे (PSI) यांनी सहभाग नोंदवला.