लिव्ह इन ला’ समाजमान्यता मिळणे पूर्णत: चुकीचे

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठी साहित्यात असलेली जीवनमूल्ये आपण पाश्चात्यांचे अंधानुकरण करताना विसरत आहोत. हा आपला दोष आहे. मराठी साहित्याचा नाही. कारण लेखक हा त्याच्या लेखनातून चांगलेच मूल्य रूजवत असतो. आता लिव्ह इन लाही समाजमान्यता मिळत आहे की जे पूर्णत: चुकीचे आहे. यात जीवन मूल्ये हरवण्यास आपणच जबाबदार नव्हे का ? असा प्रश्नात्मक सुर खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर ‌‘आजच्या मराठी साहित्यातून जीवन मूल्ये हरवत चालली आहेत का’ ?या विषयावरील परिसंवादात उमटला.

परिसंवादाच्या अध्यक्ष्ास्थानी जबलपुरचे प्रशांत पोळ होते. तर डॉ. किशोर पाठक यांनी सूत्रसंचालन केले. यात डोंबिवलीचे श्रीराम शिधये व डॉ.पी.विठ्ठल यांनी सहभाग घेतला. डॉ. किशोर पाठक यांनी जीवन मूल्यांबाबतची माहिती दिली. मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी जीवनमूल्ये ही आताच निर्माण झालेली नाहीत. तर त्यांचे बीजारोपण बालपणापासून संस्कारांच्या रुपातून केले जात असते. बालकथा ते साहित्य यातून जीवन मूल्यांची पेरणी केली आहे. यासोबतच आपल्या घरातील आजी आजोबा यांच्याकडूनही गोष्टीच्या रूपातून चांगले वाईटाबाबतचे संस्कार आपल्या मनावर बिंबवले गेले आहेत. त्यामुळे मराठी साहित्यातून जीवन मूल्ये हरवलेली नाहीत.

यावेळी मत मांडताना श्रीराम शिधये म् हणाले की, साहित्यातून जीवनमूल्यांचे दर्शन होत असते. मात्र त्याचा अवलंब होताना दिसत नाही. पाश्चात्यांचे अंधानुकरण करताना दोन मुले झाल्यानंतर विवाह झाले तर ती आजची जीवनशैली म्हणून आपण सहज स्विकारतो. त्यामुळे जीवनमूल्य हरवलेली नाहीत तर ती आपणच हरवत आहोत. बदल अपरिहार्य असल्याने जीवनशैलीही बदलत आहे. हे स्पष्ट करताना त्यांनी एक उदाहरण दिल की आई वडीलांनी त्यांच्या मुलाला विचारले की तो मोठेपणी काय करणार, त्यावर त्याने उत्तर दिले की मोठे झाल्यावर तो त्यांना घराबाहेर काढणार. कारण त्यांच्या आईवडीलांनी त्यांच्या आईवडीलांना घराबाहेर काढले होते. हा पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम आहे. आता लिव्ह इन लाही समाजमान्यता मिळत आहे की जे पूर्णत: चुकीचे आहे. यात जीवन मूल्ये हरवण्यास आपणच जबाबदार नव्हे का. आता तीन पालक असलेले मुल जन्माला येत आहेत. दोन मुले झाल्यांनतर विवाह केला जातो. स्पर्म डोनेट व आयव्हीने मुले जन्माला येत आहेत. अशावेळी आपली जीवनमूल्ये कोठे आहेत. यासाठी मराठी साहित्य जबाबदार नाही. तर आपण स्वत :आहोत. जीवन हे जीवनासारखे आहे याचा शोध घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना नांदेडचे डॉ. पी. विठ्ठल म्हणाले की, आजच्या मराठी साहित्यातून जीवनमूल्ये हरवत चालली आहेत असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा एक प्र्रश्न उपस्थित होतो. तो असा की कधीतरी साहित्यात जीवनमूल्य होती आणि आता ती हरवत आहे. हा विरोधाभास का निर्माण झाला. मानवी मूल्ये यात नुसते मानवी हित अभिप्रेत नाही तर मानवासह सजीव सृष्टीचे हित व्हावे असे अभिप्रेत आहे. ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो ने सत्य, शिव व सौंदर्य ही जीवनाची मूल्ये सांगीतली होती. स्वातत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर जीवनमूल्ये बदलली आहेत. साहित्यात संस्कृती व समाजाचा संबंध येतो. समाजातील रूढी, परंपरांचा समावेश साहित्य येतो. चांगला लेखक मूल्यांची, रूढींची चिकित्सा करून ते लिहत असल्याचे सांगीतले.

तर अध्यक्ष्ा म्हणून प्रशांत पोळ यांनी मराठी साहित्यातून जीवनमूल्ये हरवत नसल्याचे ठामपणे सांगितले. शामची आई, फास्टर फेणे, बोक्या सातबंडे यांच्यासारख्या बाल साहित्यातून बालकांवर जीवनमूल्ये रूजवली. तर मोठ्यांच्या साहित्यातूनही ती रूजवली जात आहेत. मराठी साहित्यात असलेली जीवनमूल्ये आपण पाश्चात्यांचे अंधानुकरण करताना विसरत आहोत. हा आपला दोष आहे. मराठी साहित्याचा नाही. कारणे लेखक हा त्याच्या लेखनातून चांगलेच मूल्य रूजवत असल्याचेही त्यांनी सांगीतले.

Protected Content