नवी दिल्ली । फेसबुकने सत्ताधारी भाजपाला झुकते माप दिल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांना पत्र लिहिले आहे. यात भारतातील घोळाबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्ताने भारतात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी मार्क झुकरबर्गला पत्र पाठवले आहे. यात फेसबुकचे भारतातील संचालन आणि भारतातील लीडरशीप टीमची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही चौकशी एक-दोन महिन्यात पूर्ण करुन त्याचा अहवाल फेसबुकच्या बोर्डाला पाठवावा तसेच अहवाल सार्वजनिक करावा, असे वेणूगोपाल यांनी पत्रात सुचवले आहे.
व्यावसायिक कारणांमुळे चार व्यक्ती आणि भाजपाशी संबंधित असलेल्या गटांना हेट स्पीचचा नियम लागू होत नाही, असे फेसबुकच्या भारतातील धोरण संचालकांचे म्हणणे आहे असे वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या वृत्तात म्हटले होते. भाजप नेत्यांच्या द्वेषमूलक पोस्टवर कारवाई केल्यास भारतात कंपनीला व्यावसायिक धक्का बसू शकतो, असे कंपनीच्या धोरण संचालक आँखी दास यांनी आक्षेपार्ह मजकूर व चित्रफिती लक्षात आणून देणार्या कर्मचार्यांना सांगितले होते. यानंतर खळबळ उडाली असून यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.