उध्दव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा-निलेश राणे

मुंबई । कमी पगार आणि अनियमितेला कंटाळून जळगावात कंडक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणी उध्दव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.

एसटी कर्मचार्‍याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली, जळगावात वाहक म्हणून कार्यरत असलेले एसटी मनोज चौधरी यांच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून त्यात मराठी माणसांचे ठाकरे सरकार हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे.

यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर म्हटलंय की, पोलिसांनी हिंमत दाखवावी आणि उद्धव ठाकरेवर कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवावा. एसटी कामगार तडफडत आपला जीव देत आहे, या सरकारला त्यांच्या जीवाची काय पडलेली नाही. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी सगळ्या एसटी गाड्या मंत्रालयाच्या आवारात उभ्या कराव्यात मग बघा प्रश्‍न सुटतो की नाही असं आवाहन त्यांनी केलं आहे.

तर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीची अटक होऊ शकते तर एसटीचे वाहक मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणी ठाकरे सरकारमधील परिवहनमंत्री अनिल परबना का अटक करत नाही? मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाही जबाबदार धरावे अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Protected Content