जळगाव प्रतिनिधी । आरोपीला पकडण्यासाठी तक्रारदारकडून पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस नाईकास जिल्हा न्यायालयाने चार वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील तक्रारदाराच्या बहिणीला तिच्या सासरचे मंडळी छळ व मारहाण करत असून तक्रारदाराने बहिणीने तिचे सासरचे लोकांविरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास मेहुणबारे पोलीस स्थानकाचे पोलीस नाईक विजय श्रीराम पाटील (वय-38) याने सदर तपासकाम देण्यात आले होते. आरोपी पो.ना. विजय पाटील यांनी जाणून-बुजून आरोपींना अटक केली नव्हती म्हणून तक्रारदाराने त्यांना 26 मे 2015 रोजी भेटून आरोपींना अटक करण्याची विनंती केली असता आरोपी पोलीस नाईक विजय पाटील यांनी तक्राराकडे पाच हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रार धुळे येथील लाचलुचपत विभागाकडे 28 मे 2015 रोजी तक्रार दिली होती. यासंदर्भात तक्रारदाराची पडताळणीसाठी लाचलुचपत विभागाने सापळा रचून पोलीस नाईक विजय पाटील यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज जळगाव सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. मोहन देशपांडे यांनी पाच साक्षीदार तपासले. या साक्षीदार आत सरकारी पंच म्हणून समाधान शिंदे, तत्कालीन सक्षम अधिकारी जिल्हा अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर व तपास अधिकारी विजय चौरे, पोलीस निरीक्षक यांची साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्या. आज न्यायालयात दाखल केलेला पुरावा व सरकारतर्फे वकील मोहन देशपांडे यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी आरोपी विजय पाटील यास दोषी ठरवत लाच मागणी प्रकरणी 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा तसेच लाच स्वीकारल्या प्रकरणी 4 वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.