नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या : किसान कॉंग्रेस

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अतिवृष्टीमुळे जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून याचे पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी किसान कॉंग्रेसने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

जिल्हा किसान कॉंग्रेस सेल यांनी रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, तापी व पूर्णा नदीच्या महापूरामुळे जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात काठालगत असलेल्या शेती पिकांचे नदीच्या पाण्याने प्रचंड नुकसान झालेले आहे.शेतकर्‍यांच्या झालेल्या उभ्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्या.व जळगाव जिल्ह्यातील सरदार सिंगल सुपर फास्फेट दाणेदार खतामुळे जमिनीचे व पिकांचे झालेल्या नुकसानीचे शेतकर्‍याना आर्थिक मदत मिळावी असू यात नमूद करण्यात आले आहे.

अलीकडेच म्हणजे ता.१७ व १८ सप्टेंबर रोजी तापी व पूर्णा नदीला आलेल्या महापुरामुळे नदी काठावरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे नुकसान ग्रस्त शेतकरी यांचे लाखो रुपयांचे पिके पाण्यात आडवी पडली तर काही पाण्यात शेती मातीसहित वाहून गेलीत. अशा नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी. तर जळगाव जिल्ह्यात सरदार कंपनीचे सिंगल सुपर फास्फेट दाणेदार कंपनीच्या रासायनिक खतांमुळे शेतकरी बांधवांचे जमिनीचे व पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात पिकांची वाढ खुंटून जमिनीवर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे जमीन नापिक होऊन नुकसान झाल्याने संबंधीत कंपनीकडून नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळावी अशीही मागणी यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली.

याप्रसंगी किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पिरन पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, अमळनेर बाजार समितीचे संचालक तथा खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, धनगर दला पाटील,कलाली येथील विनोद पाटील, निळकंठ निकम,अविनाश भालेराव, श्रीधर चौधरी,विजय वाणी,राहुल बाहेती,कॉंग्रेस प्रचार प्रमुख मुदाधिर देशमुख,मनोज वाणी, आदी यावेळी उपस्थित होते.

Protected Content