यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव बु॥ ग्रामपंचायतीच्या सेवानिवृत पाणीपुरवठा कर्मचाऱ्याने सेवानिवृतीनंतर मिळणारी फंडाची रक्कम व थकीत पगार न मिळाल्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आजपासून (दि.४) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, किनगाव बु॥ ग्रामपंचायतीमध्ये साहेबराव भगवान साळुंके हे १९८५ साली पाणीपुरवठा कर्मचारी म्हणुन सेवेत लागले होते. ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते २०१८ साली सेवानिवृत झाले होते. साहेबराव साळुंके यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅज्युईटीची रक्कम एक लाख १८ हजार ४०४ रुपये, फंडाची रक्कम ८८ हजार ८०८ रुपये आणि थकीत पगारची रक्कम एक लाख ५३ हजार ३०० रुपये अशी एकुण रक्कम तीन लाख ४२ हजार ५०९ रुपये ही आपल्या हक्काची रक्कम तत्काळ मिळावी यासाठी आपण सरपंच, ग्रामविकास अधिकारी, येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तक्रार निवेदने देवुन काहिही उपयोग झाला नाही.
त्यामुळे साळुंके कुटुंबावर आर्थीक संकट ओढवून उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला न्याय मिळवा म्हणुन त्यांनी आज सकाळी १०.०० वाजेपासुन बेमुदत उपोषण सुरु केले आहे. कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव अमृतराज महाजन यांनी उपोषणस्थळी साळुंके यांची भेट घेवुन त्यांना पाठींबा दिला आहे. त्याचप्रमाणे माजी पंचायत समिती सदस्य व शिवसेना पदाधिकारी रवीन्द्र निंबा ठाकुर यांनीही उपोषणस्थळी भेट दिली आहे.