मोठी बातमी : पहेलगाममध्ये जळगाव जिल्ह्यातील महिला बचावल्या !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील दोन महिला पर्यटक या देखील आपल्या मैत्रिणींसह अडकून पडल्या होत्या. सुदैवाने या हल्ल्यात त्यांना कोणतीही इजा झाली नसून त्या सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केल्याने २० पेक्षा जास्त पर्यटक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. यात जखमींमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती आधी जाहीर करण्यात आली असून यातील दोघांचा मृत्यू झाल्याचेही काही वृत्तवाहिन्यांवरून सांगितले जात आहे.

दहशतवादी हल्ला झाला तेव्हा जळगाव येथील पत्रकार तथा कलावंत तुषार वाघुळदे यांच्या सौभाग्यवती नेहा वाघुळदे या आपल्या मैत्रीणींच्या ग्रुपसह तेथे उपस्थित होत्या. त्यांनी चार वाजता तुषार वाघुळदे यांना कॉल करून आम्हाला लष्कराच्या लोकांनी घेरले असल्याचे सांगितले. यानंतर त्यांचा फोन बंद झाला असून त्यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे वाघुळदे हे चिंतेत पडले होते. तथापि, रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांचा सौ. नेहा वाघुळदे यांच्याशी संपर्क झाला. यात त्यांनी त्या सुखरूप असल्याचे सांगितले. तर नेहा वाघुळदे यांच्या सोबत जिल्ह्यातील त्यांची एक मैत्रीण आणि इतर शहरांमधील अन्य मैत्रीणीदेखील या हल्ल्याच्या प्रसंगी तेथे हजर होत्या व त्या सर्व जणी सुरक्षीत असल्याची माहिती तुषार वाघुळदे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबतची माहिती मिळताच तात्काळ पहलगाम येथील स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. यात नेहा वाघुळदे यांच्यासह जिल्ह्यातील इतर देखील काही पर्यटक दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी तेथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. हे सर्व जण सुखरूप असून प्रशासनाने त्यांना सुरक्षितपणे ठेवल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली. तर, रावेर येथील तहसीलदार बंडू कापसे हे देखील परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. यासोबत, आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी देखील लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीकडून याबाबतची माहिती घेतली.

Protected Content