Home Cities जळगाव सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जळगावचा पाठिंबा; सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण निदर्शने

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जळगावचा पाठिंबा; सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण निदर्शने

0
125

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लडाखमधील शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला १९ दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जळगावातील जागरूक नागरिकांनी त्यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा जाहीर केला आहे. यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण निदर्शने आयोजित करण्यात आली असून, शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आंदोलनाच्या समर्थनार्थ जळगावातील समविचारी नागरिकांची बैठक गजानन मालपुरे यांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी सहभाग घेत सोनम वांगचुक यांनी लोकशाही मार्गाने मांडलेल्या मागण्यांना पाठिंबा देण्याचा एकमताने निर्णय घेतला.

बैठकीस गजानन मालपुरे, शरद तायडे, ॲड. जमील देशपांडे, विनोद शिंदे, अशोक लाडवंजारी, जमील शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था, पर्यावरण संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

बैठकीत सोमवारी दुपारी १२ ते १ या वेळेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण निदर्शने करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निदर्शनातून सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना नैतिक पाठिंबा व्यक्त करण्यात येणार असून, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाशी एकात्मता दर्शविण्यात येणार आहे.

यावेळी उपस्थितांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न हा केवळ लडाख किंवा एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशातील तरुणाईच्या भवितव्याशी निगडित आहे. शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याने या आंदोलनाला पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

बैठकीत जळगाव शहर व जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था, युवक संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, पालक आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने निदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आयोजित या आंदोलनातून समाजातील विविध घटकांनी एकजुटीने सहभाग नोंदवावा, असेही आयोजकांनी नमूद केले.

या निदर्शनाचे आयोजन जळगावकर जागृत जनतेच्या वतीने करण्यात आले असून, गजानन मालपुरे, ॲड. जमील देशपांडे, जमील शेख, शरद तायडे, अशोक लाडवंजारी, चंद्रकांत पाटील, विनोद शिंदे, सुनील माळी, ज्ञानेश्वर कोळी, पियुष गांधी, प्रमोद पाटील, ललित शर्मा, विनायक पाटील, चेतन पवार, प्रदीप पाटील, रमेश पाटील आदी आयोजकांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound