मालवाहू रिक्षाला कारने उडविले; एक ठार, एक जखमी

जळगाव प्रतिनिधी | भरधाव वेगाने धावणार्‍या कारने मालवाहू रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. मयत आणि जखमी हे दोन्ही जामनेर तालुक्यातील रहिवासी आहेत.

याबाबत वृत्त असे की, जामनेर येथील सुनील अभिमन्यू शार्दूल यांचे ट्रॅक्टर ट्रॉलीचा व्यवसाय आहे. यामुळे ते नेहमी जळगावच्या एमआयडीसीतील कंपनीतून ट्रॉलीचा सामान नेत असतात. या अनुषंगाने ते आज भरत उखा ढोकणे (रा. मालदाभाडी, ता. जामनेर) यांच्या मालवाहू रिक्षेतून जळगावला आले होते. एमआयडीतीसील कंपनीतून ट्रॉलीचा सामान रिक्षेत मागे ठेवून ते जामनेरला निघाले होते.

चिंचोली ते उमाळा या गावांच्या दरम्यान महामार्गावर जळगावकडून मागून येणार्‍या भरधाव कारने त्यांच्या रिक्षाला उडविले. यामुळे मालवाहू रिक्षेने तीन-चारदा पलटी घेतली. या अपघातात भरत उखा ढोकणे ( वय ३४, रा. मालदाभाडी, ता. जामनेर) यांचा जागीच मृत्यू झाला असून सुनील अभिमन्यू शार्दूल (वय ३०, रा. जामनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Protected Content