जळगाव प्रतिनिधी । येथील कारागृहातून पळून गेलेले कैदी गौरव पाटील व सागर पाटील यांच्यासह त्यांना मदत करणारे अमित चौधरी व नागेश पिंगळे या चौघांना पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे. तर सुशील मगरे हा अद्याप फरार आहे.
याबाबत वृत्त असे की, २५ जुलै रोजी सुशील मगरे, सागर पाटील व गौरव पाटील हे तिघे पिस्तूलचा धाक दाखवत कारागृहातून पळून गेले होते. भर दिवसा घडलेल्या या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता या तिघांना पळून जाण्यासाठी जगदीश पाटील, अमित चौधरी, नागेश पिंगळे व शिंदखेडा येथील एका तरुणाने मदत केल्याचे दिसून आले होते.
अनेक दिवसांपर्यंत या गुन्हेगारांनी पोलिसांना गुंगारा दिला होता. यानंतर एलसीबीच्या पथकाने जगदीश पाटील याला अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहिती आधारावर पुढे सागर, अमित, नागेश व गौरव या चौघांना अटक केली. या चौघांचीही कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. यातील एकाला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला कारागृहातच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य संशयित बडतर्फे पोलीस कर्मचारी सुशील मगरे हा अद्याप फरार असून त्याचा पोलीस पथकातर्फे कसून शोध घेतला जात आहे.