जळगाव प्रतिनिधी । आठवडे बाजार असल्याने भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या महिलेला अज्ञात महिलेने धक्का देवून पिशवीतील पर्ससह सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना कासमवाडी बाजारात शनिवारी सायंकाळी घडली. याबाबत रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल जगदीश नेमाडे (वय-21) रा विठ्ठल पेठ, जुने जळगाव या शनिवारचा आठवडे बाजार असल्याने भाजीपाला घेण्यासाठी शनिवारी 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास कासमवाडी येथे गेल्या. बाजारात जात असतांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत सैल झाल्यामुळे त्यांनी काढून पर्समध्ये ठेवली सोबत ओप्पो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम होते. बाजार करत असतांना एका अज्ञात महिलेचा धक्का लागल्याने त्यांच्या हातातील बाजाराची पिशवी खाली पडली. त्यामुळे पिशवीमधील भाजीपाला खाली पडले, दरम्यान यावेळी बाजार उचलत असतांना पर्स गायब झाल्याचे महिलेल्या लक्षात आले. 39 हजार रूपये किंमतीची 13 ग्रॅम सोन्याची चैन, 13 हजार रूपये किंमतीचा ओप्पो मोबाईल आणि 450 रूपये रोख असे एकूण 55 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.