नवीदिल्ली, वृत्तसंस्था | सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशाच्या वेगवेगळया भागामध्ये हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहेत. पण सरकार मात्र कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. “कुठल्याही प्रकारे हिंसाचाराचे समर्थन करता येणार नाही. परिस्थिती बिघडेपर्यंत थांबून कायदा-सुव्यवस्था राखली जाईल का ?” असा सवाल गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.
जमावाकडून सुरु असलेला हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांना कारवाई करणे भाग पडले, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात फक्त अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, जामिया मिलिया विद्यापीठ, लखनऊ आणि जेएनयू या चार विद्यापीठांमध्ये मोठया प्रमाणावर विरोध झाला आहे, असे अमित शाह इंडिया इकोनॉमिक कॉनक्लेव्ह परिषदेत त्यांनी सांगितले. “देशभरात ४०० विद्यापीठे आहेत. त्यातील फक्त २२ विद्यापीठांमध्ये आंदोलने झाल्याचे समोर आले आहे,” जामियामध्ये तोडफोड आणि हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.” असे शाह यांनी म्हटले आहे.