कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे – खा. उन्मेश पाटील

चाळीसगाव  प्रतिनिधी । कोरोनाच्या या भयंकर काळात फ्रंटलाईन वर्कर यांचे कोरोनामुळे निधन  झाल्यास 50 लाखाचे विमा कवच राज्य शासनाने लागू केलेले आहे. या पाश्र्वभूमीवर कृषी विभागातील कर्मचाऱ्यांसह अधिकारी यांना ५० लाखांचे विमा कवच द्यावे अशी मागणी पत्राद्वारे खा. उन्मेष पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्य सरकारने दि. 29 मे 2020 रोजी फ्रंटलाईन वर्करबाबत महत्वाचा निर्णय घेतला. कोरोनाच्या काळात फ्रंटलाईन वर्कर यांचे कोरोनामुळे निधन  झाल्यास 50 लाखाचे विमा कवच राज्य शासनाने लागू केलेले आहे. वरील नियमानुसार कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आदी कर्मचारी वर्गाला ५० लाखांचे विमा कवच लागू करण्यात यावे अशी मागणी खा. उन्मेष पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर जाऊन बी बियाणे विक्री करून सेवा देणे तसेच कंपनीने ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण आदी जबाबदारी कर्मचार्यांकडून  पार पाडली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर हि मागणी पूर्ण करण्यात येण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच खा. उन्मेष पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे की, राज्यातील कृषी विभागातील सुमारे 2000 कर्मचारी अद्यापपावेतो कोरोना बाधित झालेले आहेत. यापैकी 60 ते 65 कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. एकट्या माझ्या मतदार संघात अकरा क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची घटना घडली आहे. ही बाब कृषी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी आहे. अशा कुटुंबातील कर्ता व्यक्तीचे अकाली निधन झाल्याने परिवारावर आघात झाला असल्याने कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे परिवार चिंतेत असल्याने आपण तात्काळ कोरोना मुळे निधन झालेले कर्मचारी यांना 50 लाखाचे विमा कवच मंजूर करून त्यांच्या वारसांना अनुकंपाच्या नियमानुसार शासनाच्या सेवेत सामावून घ्यावे. असेही आवाहन खा. उन्मेष पाटील यांनी केले आहे.

Protected Content