
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी अंतर्गत जळगाव जिल्ह्यातून वीस ग्राम साधन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या व्यक्तींना वर्षभरात केवळ दोन महिनेच काम मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया आणि शोषण ऑडिटचे काम तातडीने सुरू करून या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांना निवेदन दिले.


या निवेदनात तरुणांनी म्हटले आहे की, “आमची नियुक्ती सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी अंतर्गत झाली आहे. मात्र, आम्हाला वर्षभरात केवळ दोन महिनेच काम मिळाले आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. सामाजिक अंकेक्षण आणि शोषण ऑडिटचे काम तातडीने सुरू करून आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावा.”
या तरुणांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडली आणि तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. या निवेदनाची दखल घेऊन उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्या आहेत.


