गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- अतुल भातखळकर

 

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील काही आयपीएस अधिकारी सरकार उलथून टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुखांनी केल्यानंतर यावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत त्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो वेळीच हाणून पाडण्यात आला, असा गौप्यस्फोट  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका करताना, राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर आहेत. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

भातखळकर म्हणाले, वाचाळवीर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नवीनच शोध लावला आहे, की राज्यातील काही आयपीएस अधिकारी ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे, सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर सरकारने काय कारवाई केली? याची माहिती त्यांनी एवढे दिवस जनतेपासून का लपवून ठेवली? तसेच सुशांत आणि दिशा सालीयन प्रकरणात दोन महिने ज्यांना इंचभरही पुढे सरकता आले नाही, ते पोलीस अचानक ठाकरे सरकार पाडण्या इतके सक्षम कसे झाले? त्यांनी असे कोणते च्यवनप्राश खाल्ले? असे सवालही भातखळकर यांनी सरकारला केले आहेत.

Protected Content