जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलीत गोदावरी अभियांत्रीकी व तंत्रनिकेतनला ऑटोनॉमस अर्थात स्वायत्त दर्जा मिळाला असून ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.
माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांच्या व्हिजनरी दृष्टीकोनातून सुरू झालेल्या गोदावरी अभियांत्रीकी व तंत्रनिकेतनने गेल्या पंचवीस वर्षात हजारो विद्यार्थ्यांना अविरतपणे ज्ञानदान केले असून यातील बहुतांश विद्याथ हे जगभरात आघाडीच्या कंपन्यांमध्ये अधिकारी व अनेक जण उद्योजकतेत शिखरावर पोहचले आहेत. आता संस्थाला पुन्हा एक मोठा गौरव प्राप्त झाला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक घडामोड ठरली आहे. गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) कडून २०२५-२०२६ ते २०२९-२०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा (Autonomous Status) बहाल करण्यात आला आहे.
ही मान्यता २३ जुलै २०२५ रोजी युजीसी स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली, जिथे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, भक्कम पायाभूत सुविधा, अनुभवी व उत्कृष्ट प्राध्यापकवर्ग आणि नवोन्मेषी शिक्षणपद्धती यांचा सखोल आढावा घेण्यात आला.
स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यानंतर महाविद्यालयाला नवीन अभ्यासक्रम रचना, उद्योगाधारित कौशल्यकेंद्रित शिक्षण, स्वतः परीक्षा घेण्याची मुभा, आणि विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती अमलात आणण्याचा अधिकार मिळतो. तथापि, महाविद्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेशी संलग्न राहणार आहे.
या यशाबद्दल प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “UGC कडून स्वायत्ततेचा दर्जा मिळणे ही आमच्या आजवरच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची मान्यता असून, यामुळे आम्ही उद्योगानुसार अभ्यासक्रमात तात्काळ सुधारणा करू शकतो. हे पाऊल आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवेल.”
१९९९ मध्ये स्थापन झालेल्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा आजवर जपली असून, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांतून हजारो अभियंते घडवले आहेत. या संस्थेने NAAC मानांकन, नवीन पॅटंट, आणि उच्च शिक्षणासाठी परदेशात संधी अशा विविध माध्यमांतून सतत प्रगतीचा पल्ला गाठला आहे.
ही मोठी उपलब्धी शक्य झाली आहे केवळ महाविद्यालयाच्या प्रशासन, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे. महाविद्यालय आता संशोधन, स्टार्टअप इनक्युबेशन, ग्लोबल सहकार्य आणि कौशल्याधारित शिक्षणामध्ये अधिक विस्तार करण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
विद्यार्थ्यांना अधिक स्वायत्त आणि लवचिक शैक्षणिक अनुभव देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विश्वास बाळगावा की, या बदलामुळे शिक्षणाची गुणवत्ता आणखी उंचावेल.
स्वायत्त दर्ज्याचे महत्त्वाचे फायदे:
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ते २०२९-३० पर्यंत वैध
⚡अभ्यासक्रम डिझाइन करण्याचे स्वातंत्र्य
⚡उद्योगाधारित आणि कौशल्यवर्धक अभ्यासक्रमाची अंमलबजावणी
⚡परीक्षा व मूल्यमापन यांमध्ये स्वतंत्रता
⚡विद्यार्थ्यांच्या नोकरीयोग्यतेत लक्षणीय वाढ
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय आता नव्या युगात पदार्पण करत आहे, जेथे शिक्षण फक्त पुस्तकी न राहता, नवकल्पनांशी जोडलेले आणि जागतिक स्तरावर सुसंगत असेल. महाविद्यालयाच्या या ऐतिहासिक टप्प्यावर सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन!
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर यांनी स्वायत्तेवर भाष्य करताना सांगितले की स्वायत्ततेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल म्हणजे नव्या यशाची सुरुवात आहे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय आता उद्याचे जागतिक अभियंते घडवेल. तसेच गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील मॅडम डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. वैभव पाटील सर (डी एम कार्डिओलॉजिस्ट), अनिकेत पाटील सर यांनी या यशाबद्दल कौतुक केले आहे.



